Sunday, October 5, 2008

निरंतर प्रभावित

काल जय म्हणाला "मला माझा शाळेचा पहिला दिवस आठवतोय".
म्हटले "थापा मारू नकोस. काय आठवतेय तुला सांग बरं? "

"तू मला क्लासमध्ये सोडून गेलीस, आणि मी खूप रडलो. " जय.

"तू आज कोणालातरी रडताना पाहिले असशील, आणि आता मला त्याची कहाणी सांगतोयस. सांग बरं तुझ्या थ्रीज क्लासमधल्या टीचरचं नाव. " मी.

"टीचरचं नाव आठवत नाही, पण तिने हिरवा शर्ट घातला होता. " जय. आहाहा! जेमतेम सात वर्षाचे वय आणि टोलेजंग थापा? शर्टाचा रंग निवडलास. मला कुठे लक्षात आहे तिच्या शर्टाचा रंग!?

"आणखी काय आठवते तुला? " मी जयला.

"मी खूप वेळ रडलो, आणि सोफिया मला समजावायला आली. " जय.

सोफिया होती त्याच्या थ्रीजच्या क्लासमध्ये, आणि तिने त्याच वर्षी ती शाळा सोडली होती. याला खरोखरच आठवतेय? आणि ही चार वर्षांपूर्वीची गोष्ट, म्हणजे त्यावेळी जयचे वय वर्षे तीन!

"तुला आपले जुने घर आठवते का? " ते घर बदलूनही चार वर्षे होत आली आहेत.

"हो. आपल्या शेजारी राहणारी बाई गोरी (व्हाइट) होती. " - इंटरेस्टिंग. सिल्विया आठवतेय याला?

"आणि तिकडची छोटी शाळाही आठवत्येय. " जय. आता मात्र कमाल झाली. ही सोफियाच्याही आधीची गोष्ट!

"त्या शाळेतले काय आठवतेय? " मी - जयला.

"त्या शाळेत मला दुपारी झोपायला लावायचे. सगळीकडे अंधार असायचा. मला अजिबात आवडायचे नाही. "

अरे देवा! तिथेच तर सुरुवात झाली होती त्याच्या ऍक्झायटीची! सगळी मुले डे-केअर मध्ये जातात. जयलाही सवय व्हायला हवी या माझ्या अट्टहासाने, नवरा नको म्हणत असताना, त्याला घरगुती डे-केअर मध्ये घातले. तो एवढा रडला की त्या बाईने सांगितले "बाकीच्या मुलांवर परिणाम होतो. तुम्ही थोडे दिवस थांबून बघा, किंवा दुसऱ्या ठिकाणी सोय करा. " माझं इतकं गोजिरं मूल दुसऱ्या कोणाला नकोसं वाटू शकतं ही जाणीव पहिल्यांदाच. पालकत्वाच्या ट्रेनिंगमधला महागात पडलेला एक धडा. :)

जयला हे सगळे आणखी किती दिवस आठवेल कुणास ठाऊक. सात वर्षांचा असताना त्याला अडीच-तीन वर्षाचा असतानाच्या गोष्टी आठवतायत. जरनल ठेवायला हवी.

माझी जुन्यात जुनी आठवणही शाळेतली, मी ५-६ वर्षांची असेन. बालवर्गात गणेश मातोंडकर नावाचा मस्तीखोर मुलगा होता (बा गणेशा, तू केलेले इंप्रेशन लक्षात घे, बाकी काय म्हटलेय ते सोडून दे ; ) त्याने त्याच्या वयाला न शोभणारे काही बोलल्याचे पुसटसे आठवतेय. बालवर्गातल्या छोट्या लाकडी, निळ्या रंगांच्या बैठया बाकावर बसून त्याने ती मुक्ताफळे उधळली होती हेही आठवतेय.

पुढची आठवण इयत्ता दुसरी. मावसभावाच्या लग्नासाठी पुण्याला गेलो होतो. लग्नातल्या पुणेरी जेवणाची (सुधारस आणि अळूचे फदफदे हा लग्नाच्या जेवणाचा मेनू लक्षात राहिलाय! ) मावशी मंडळात झालेली चर्चा, आणि लग्नाहून परत येताना बसला झालेला अपघात, त्या अपघाताचे मी गवळी बाईंकडे केलेले वर्णन.

गणेश मातोंडकरचे बोलणे आठवत नसले तरी त्याने लॉंग लास्टिंग इंप्रेशन माझ्या मनावर केले होते हे स्पष्ट आहे. सुधारस हा पूर्वी कधीही न चाखलेला पदार्थ प्रिय मावशीमंडळात एवढी खळबळ उडवतो म्हणजे हा काहीतरी महा सोफिस्टिकेटेड प्रकार दिसतो अशी नोंद मेंदूने केली. आणि त्या अपघातामुळे गवळी बाईंची भरपूर सहानुभूती आणि त्यांच्याबरोबर एअर टाइमही मिळवता आला एवढे कळले.

पाचवीत असताना आजोबा गेले तेव्हा आईला पहिल्यांदा रडताना पाहिले. मोठी माणसेही रडतात हे कळले.

सातवी आठवीत रामुगडे सरांबरोबर शाळेच्या मासिक भित्तिपत्रकावर केलेले काम बरेच काही शिकवून गेले. मासिकासाठी माहिती, चित्रे जमा करणे, लेख लिहिणे, एक छोटी कविता केल्याचेही आठवतेय. रामुगडे सरांच्या खूप आठवणी आहेत. बऱ्याचा वर्षांनी एकदा कुर्ला स्टेशनवर भेटले होते. खूप गप्पा मारल्या. नंतर काही दिवसांनी कळले की त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अजूनही त्यांचा हसरा, मिष्किल चेहेरा डोळ्यांसमोर येतो. माझ्या गांधीजींच्या चित्राला खूप हसले होते सर - गांधीजी जरा बाळसेदार दिसतायत म्हणून. ट्रेनमधून पडून मृत्यू? विश्वास बसला नाही माझा. काय झाले असावे बरे? रामुगडे सर शाळेत आले तेव्हा त्यांचे लग्नही झाले नव्हते. किंचित काळेपणाकडे झुकणारा सावळा वर्ण, सोनेरी काड्यांचा स्मार्ट चष्मा, दाढी, एकूण आनंदी व्यक्तिमत्व. मराठी आणि समाजशास्त्र शिकवायचे, अगदी मनापासून. अगदी "तारे जमींपर" मधल्या आमीर खान सारखे रंगीबेरंगी कपडे घालून नाचत नसत, पण यू गेट दी आयडिआ. मला पक्के माहित आहे की माझ्यासारख्या आणखी शेकडो विद्यार्थ्यांना ते तसेच आठवत असतील. ही टच्ड सो मेनी लाइव्हस फॉरएव्हर.

साउजी सरांनी वि. स. वाळिंबेंचे "वोल्गा जेव्हा लाल होते" वाचायला सांगितले. लायब्ररीतून लगेच मिळवून वाचले, आणि त्यानंतर ऐतिहासिक पुस्तके वाचण्याचा सपाटाच लावला. एक छोटी गोष्ट, पण आयुष्यभराची आवड आणि सवय देउन गेली.

मावशी, काका, मामा यांच्या बऱ्याच आठवणी. साळवी काकांनीही बरेच लाड केले. अजूनही करतात भेटले की. पण भेटच दुर्मिळ झालिये. मी काय वाचतेय, काय ऐकतेय याच्याकडे आई-बापूंचे नव्हते तेव्हढे त्यांचे लक्ष होते त्यावेळी. मला शास्त्रीय संगीतातले फार काही कळत नव्हते. पण किशोरी आमोणकर, कुमार गंधर्वांचे गाणे ते आवर्जून ऐकवायचे. अनवट रागांबद्दल सांगायचे.

खरेच एक आयुष्य बनविण्यात किती व्यक्तिंचा आणि घटनांचा हातभार लागलेला आहे. कुणाकुणाकडून काय काय घेतलेय... आय ऍम इटर्नली इंप्रेस्ड.

5 comments:

भानस said...

अगदी खरयं, आयुष्यात न कळत्या वयापासून आजवर कोणाकोणाकडून काय काय शिकलोय आपण. काही घटना कितीही काळ लोटला तरीही अक्षर न अक्षर आठवतात.
पोरांची स्मरणशक्ती जास्ती तेज असते असा माझा अनुभव आहे.खूप छान वाटले सीमा, सुंदर मांडले आहेस.

HAREKRISHNAJI said...

वा

Arun Desale said...

अच्छा तर सीमाजी आपले नाव इटर्नली इम्प्रेस्ड आहे तर! सुंदरच लेख. निरंतर प्रभावित असणारे असेच जीवन समृध्द करतात. :-)

Seema Padalkar said...

:) mee yaa jagaache aani majhya sabhovataalachya lokaaMche kevaDhe moThe deNe laagate. They make me who I am. And I feel blessed.

Unknown said...

सीमा..... सुंदर मनोगत... गणेश मातोंडकर डोळ्यासमोर तरळून गेला. नाहीये तो या जगात. रामुगडे सरांच्या आठवणी आणि "वाटचाल" भित्तीपत्रक आणि त्यासाठी केलेला खटाटोप... आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी रामुगडे सरांनी दिलेले उत्तेजन आणि प्रोत्साहन... सारेच न विसरण्याजोगे... या सगळ्या संस्कारामुळे आयुष्यात कायम सकारात्मक विचार करायला शिकवले... :)